Wednesday, January 15, 2014

नामदेव ढसाळ : आई



आई गेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते
दुःख याचं आहे,
की अज्ञानाच्या घोषा आत
तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या
गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली
मरीआईचा गाडा
विस्थापित होऊन बाप आगोदरच
धडकला होता शहरात
आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन
कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने
तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता
तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची
बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता
प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा
रक्तबंबाळ व्हायचा
चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही
शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं
पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता
जुनेराला ठिगळ लावलं
बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं
बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे
आई आगोदर बाप मेला असता,
तरी मला त्याचं काही वाटलं नसतं
दुःख याचं आहे,
तोही तिच्या करारात सामील होता
दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले
लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं
प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली
स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला
आभाळाकडे हात करून ती म्हणायची,
त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...
आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे...
विजा का चमकतात? पाउस का पडतो?
तो सांगू पहायचा आजीला,
माझ्या येडपटा,
म्हणत ती त्याच्या पाठीत धपाटा टाकायची
बाबा नियंत्याची अशी चेष्टा करू नये म्हणायची,
तिला हे जग, गैबान्याची शाळा वाटायची
ती म्हणायची,
पृथ्वी म्हणजे त्याने अंथरलेली लांब चादर आहे
तिला आदी नाही अंत नाही...
उन - सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची
आई मेली याचं दुःख नाही
प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते