Wednesday, February 18, 2026

मर्ढेकर - शिशिरागम

शिशिरागम

 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
 एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें! 

 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 

 - बा. सी. मर्ढेकर 

 शिशिर ऋतू आहे आणि पानगळ सुरू झाली आहे... यावेळी ही कविता आठवतेच आठवते. 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें, 
एकेक पान गळावया 
कां लागता मज येतसे 
नकळे उगाच रडावया. 
  एकेक पान आहे. इथे प्रत्येक पान महत्त्वाचं आहे हे कळतं आणि एकेक मधे ती गळण्याची संथ गती आहे. 
 उगाच रडावया.. 
 असं एकेक पान गळत असता उगाच रडायला येतं. कळतही नाही, का ते! 
 पानात जी निजली इथे 
इवलीं सुकोमल पाखरें, 
जातील सांग अता कुठे? 
निष्पर्ण झाडिंत कांपरें 
 रडायला येण्याचं एक कारण आहे हे! 
पाखरं कशी आहेत? इवली आणि सुकोमल 
 जातील सांग अता कुठे? इथे आपल्याला कळतं की हे कुणाशी तरी बोलणं चाललेलं आहे. कोण आहे ती? 
 फुलली असेल तुझ्या परी, 
 बागेतली बकुलावली; 
 वाळूंत निर्झर-बासरी; 
 किती गोड ऊब महितलीं! 
 जेव्हा इथे पानगळ होते आहे तेव्हा तिच्या बागेत बकूळ... बकुलावली असं म्हटलं आहे. तिच्या बागेतल्या झाडालाही असं एक आवडीचं नाव दिलेलं आहे, फुलली आहे. शिशिर ऋतू ने बकुलावली ला फुलवलं आहे आणि बाकी कविच्या बागेतल्या झाडांची पाने त्यामुळे गळताहेत. 
 येतील हीं उडुनी तिथे, 
 इवली सुकोमल पाखरें, 
 पानात जीं निजली इथे. 
 निष्पर्ण झाडिंत कांपरें! 
 आता थोडं हायसं वाटतं आहे की कुठेतरी या पाखरांना जायला जागा आहे. 
 पुसतो सुहास, स्मरुनिया 
 तुज आसवें, जरि लागलें 
 एकेक पान गळावया 
 शिशिरर्तुच्या पुनरागमें. 
सुहास ही कवीची प्रेयसी आहे, तिच्याशी मागे कधीतरी, वियोगाच्या वेळी बोलणं झालं आहे, तेव्हाची तिची आसवे आठवून, तिच्या प्रेमाची खात्री असल्याने, कवी तिला विचारतो आहे की तूच आता सांग.. शिशिर ऋतू त एकेक पान गळायला लागलं की मला असं का होतं? माझ्या पेक्षा तू मला जास्त ओळखतेस तूच सांग.
 हा एक साधा कळणारा अर्थाचा वरचा थर आहे. 
 त्याच्या आतला थर कुठला? शिशिर ऋतू म्हणजे काय? हे पानगळ होणारं झाड कुठलं? शिशिर म्हणजे नैराश्य, उदासपणाचा मनाचा ऋतू आहे. झाड हे मन आहे. बाहेर शिशिर असेल तेव्हा आतल्या शिशिराची आठवण येते आणि आतला शिशिर सुरू झाला की बाहेरचा शिशिर आठवतो असंही आहे. 
 पानात जी निजली इथे इवली सुकोमल पाखरे स्वप्नं आहेत.. दोघांनी मिळून पाहिलेली. मनाच्या शिशिर ऋतूत असं होतं की ती स्वप्नं सांभाळता येत नाहीत. बकूळ मात्र सदाहरित, पानांनी गच्च भरलेला, सुगंधी फुले असणारा आहे, त्याच्यावर शिशिराचा अंमल चालत नाही. अशा वेळी ती इवली सुकोमल स्वप्नं ती सहज सांभाळते. ....... जरि लागले एकेक पान गळावया यातला महत्त्वाचा शब्द आहे, पुनरागमे शिशिरर्तुच्या पुनरागमे हा पुन्हा आलेला शिशिर आहे, तो ही ग्वाही देतो की तो पुन्हा जाणारही आहे आणि वसंत येणार आहे. 
 कविता नुसती एक घटना, मनातली हालचाल, एक गोष्ट सांगणारी नसते. कवितेत हे महत्त्वाचं असतं की ती कशी सांगितली आहे? कवितेचा घाट, लय आणि शब्दांची निवड! त्याने काय होतं की अर्थ नाही कळला तरी ती कविता सारखी सारखी आठवते, म्हणावीशी वाटते. अशी म्हणत असता तिचा अर्थही न कळता, कळल्यासारखा वाटायला लागतो. किंबहुना जे शब्दात मांडताच येणार नाही तेही कळल्यासारखं होतं, ती वाचताना थेट अनुभव देते....
 शिशिरर्तुच्या पुनरागमे... 
एकेक पान गळावया... 
कां लागता मज येतसे... 
नकळे उगाच रडावया....
 ती उदासी, ते रडायला येतसं होणं.... व्हायला लागतं. 
 खरं म्हणजे चांगल्या कवितेला ज्याचं त्यानं भिडावं हेच खरं.... नंतर त्यावर काही बोलू नये.... त्या कवितेत राहावं... 

 -- विद्या कुळकर्णी 
  २८ फेब्रुवारी २३

Thursday, March 21, 2024

चित्रवीणा बा. भ. बोरकर

 चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी

कुठे दुधावर आली शेते

थंडाव्याची कारंजीशी

कुठे गर्द बांबूची बेटे


जिकडे तिकडे गवत बागडे

कुठे भिंतीच्या चढे कडेवर

ती म्हातारी थरथर कापॆ

सुखासवे होऊनी अनावर


तारांमधला पतंग कोठे

भुलूनि गेला गगनमंडला

फ़णा डोलवित झोंबू पाहॆ

अस्तरवीच्या कवचकुंडला


उंचवट्यावर म्हशी गोठल्या

तसेच कोठे कातळ काळे

वर्ख तृप्तिचा पानोपानी

बघून झाले ओलेओले


कोठे तुटल्या लाल कड्यावर

चपळ धीट बकरीची पोरे

एक त्यातले लुचे आईला

सटीनकांति गोरे गोरे


फूलपंखरी फूलथव्यांवर

कुठे सांडली कुंकुमटींबे

आरसपानी पाण्यावरती

तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे


कुठे आवळीवरी कावळा

मावळतीचा शकून सांगे

पूर्वेला राउळ इंद्राचे

कोरीव संगमरवरी रंगे


घाटामध्ये शिरली गाडी

अन रात्रीचा पडला पडदा

पण चित्रांची विचित्रवीणा

अजूनि करते दिडदा दिडदा


-- बा. भ. बोरकर


ही बोरकरांची एक चित्रदर्शी सुंदर कविता आहे. 

 ही निसर्गदृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात.

चित्रात विविध रंग आहेत,

" निळ्या जळावर कमान काळी"

ही ताजी, नुकती काढलेली ओली चित्रे आहेत.

 दिडदा दिडदा चा, रेल्वेच्या चाकांचा एक ठेका असतो तसा या कवितेला आहे, त्या तालावर ही चित्रे सरकताहेत.

 रेल्वेतून उतरल्यावर देखील काही काळ आपण रेल्वेतच आहोत असा भास होत राहतो, तसं ही कविता वाचून झाल्यावर देखील ही चित्रे डोळ्यासमोर तरळत राहतात.

  काही चित्रे फारच सुंदर आहेत.

" कोठे तुटल्या लाल कड्यावर

चपळ धीट बकरीची पोरे"

बकरीची पोरे आहेत ती! 

कोकरं नव्हे !

ती चपळही आहेत आणि धीटही आहेत. 😊

" एक त्यातले लुचे आईला

सटीन कांती गोरे गोरे"

एक त्यातलं कसं आहे?

सटीन कांती... सॅटीन चं कापड असतं ना चमकदार आणि स्पर्शाला मऊ... तसं.

 बघा हं, या कवितेत काय काय आहे? 

रंग आणि दृश्य आहे... डोळ्यांना

दिडदा दिडदा ... नाद आहे.. कानांना

कुठे आवळीवरी... आवळा... चव

सटीन कांती... स्पर्श

जितक्या जास्त ज्ञानेंद्रियांनी आपण एखादा अनुभव घेऊ तितका तो खोल आणि परिपूर्ण असतो.

" उंचवट्यावर म्हशी गोठल्या

तसेच कोठे कातळ काळे"

म्हशींची न हलता स्थिर राहण्याची क्षमता कमाल असते, पाण्यात डुंबणाऱ्या म्हशी काहीवेळ पुतळा भासतात. किंचित थरथरल्या की जिवंत होतात.

म्हशी गोठल्या आहेत आणि काळे कातळही स्थिर म्हशींप्रमाणे भासताहेत! कातळ थरथरल्या चा भास होतोय का??

 * वर्ख तृप्तीचा पानोपानी

बघून झाले ओले ओले *

तृप्तीचा वर्ख आहे, वर्खात तालेवारपण आहे.  ही तृप्तता बघून कातळ सुद्धा ओले झाले आहेत. नुसते ओले नाहीत तर ओले ओले....एक नाद आहे.. तरलता आहे...रमणं आहे... शिवाय इथे सगळंच +१ आहे... भरून वाहतं आहे.


 कविता वाचताना, आठवताना इथे क्षणभर थांबून ती तृप्ती डोळे मिटून अनुभवायची आहे.


 " तारांमधला पतंग कोठे

भुलून गेला गगनमंडला

फणा डोलवित झोंबू पाहे

अस्तरवीच्या कवचकुंडला"

ही हलती चित्रे आहेत, पतंग वाऱ्याने हलतो आहे.

 शिवाय इथे बघा, चित्राचा ॲंगल दिला आहे.

 मला सगळ्यात आवडणारं चित्र आहे....

 *जिकडे तिकडे गवत बागडे

कुठे भिंतीच्या चढे कडेवर

ती म्हातारी थरथर कापे

सुखासवे होऊनी अनावर*

अर्थातच ही पावसाळा सुरू होऊन काही दिवस झाल्यानंतरची दृश्ये आहेत.

 सगळीकडे गवत पसरलं आहे, ते बागडतं आहे.

 लक्षात घ्या, ते चालत नाहीये, उड्या मारत नाहीये, नाचत नाहीये, बागडतं आहे. हे इतकं गोड क्रियापद आहे, दुसरं कुठलं इथे चाललंच नसतं.

बागडण्यात काय आहे? आनंदाने मनासारखं फिरणं आहे, कधी चालत, कधी उड्या मारत, कधी नाचत, कधी जरा थांबून असणं आहे. 


 इथे बालकवींच्या श्रावणमासी ची आठवण होते

" सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती"


बागडण्यात नियमही नाहीत आणि भयही नाही.

तर असं हे गवत...

जिकडे तिकडे गवत बागडे

कुठे भिंतीच्या चढे कडेवर

बागडत असताना ते कुठे भिंतीवरही उगवलं आहे.

बोरकरांनी काय म्हंटलं आहे की भिंतीच्या कडेवर चढलं आहे. 

 किती गोड!

भिंतीची इच्छा आहे म्हणून ते कडेवर चढलं आहे केवळ त्याला चढावं वाटलं/ उगवायचं होतं, म्हणून नाही. भितींचं आणि त्याचं प्रेमाचं नातं आहे.

आई गं!!! या पुढच्या ओळी तर काय आहेत!!!!

*ती म्हातारी थरथर कापे

सुखासवे होऊनी अनावर*

ती भिंत म्हातारी आहे, तिचं वय झालंय, ती थरथरते आहे, ते केवळ वयाने नाही! नातवंडं अंगाखांद्यावर खेळताहेत याचं तिला सुख आहे. 

 अनावर होणं हे तरुणपणाचं लक्षण आहे, तिचं वय कमी झालंय. ती गदगदली आहे. त्या भिंतींचं हलणं हे तिच्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

 वाऱ्याने हलणारं गवत आणि खिळखिळी झालेली भिंत यांचा हा एकत्रित परिणाम आहे.

 नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवणारी, वय विसरून गेलेली, आनंदाने कापरं भरलेली आजी हे किती मोहक चित्र आहे!!! इथेही वर्ख तृप्तीचा आहे!!


 भिंतींचं इतकं सुंदर वर्णन मी कुठे वाचलेलं नाही.

 सुनीताबाईंच्या आजीची अळंब्यांनी भरलेली भिंत आहे... पण यानंतर!!

इतक्या कमी शब्दात , इतकं परिपूर्ण " आजीपणाचं" वर्णन करून बोरकरांनी सगळ्या आज्यांना कायमचं ऋणी करून ठेवलेलं आहे.


ही शांतपणे अनुभवायची कविता आहे. ही कविता वाचणं म्हणजे एक हे मेडिटेशन आहे.... कवितेत शिरलात की तंद्री लागते.....

 त्यातल्या नादाची, रंगांची, शब्दांची झिंग चढते.


 तशी साधी कविता आहे.

तुमची तयारी असेल आणि तुम्ही तिचं बोट धरलंत तर तुम्ही कवितेतून बागडायला लागता आणि तीही तुमच्या कडेवर चढते.

-- विद्या कुळकर्णी