Monday, November 2, 2015

भा. रा. तांबे - जन पळभर म्हणतील

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जातां राहील कार्य काय ?

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?

राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?

1 comment:

  1. राम-कृष्णही आले; गेले !
    त्याविण जग का ओसचि पडलें ?
    कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
    मग काय अटकलें मजशिवाय ?

    ReplyDelete